Mumbai: वरळीतील भाजप मोर्चावरून नवा वाद; पोलिसांकडे माहितीच नाही
वरळी येथे भाजपच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चाबाबत आता खळबळजनक माहिती समोर आली आहे. या मोर्चाबाबत पोलीस प्रशासनाकडे परवानग्या आणि इतर माहितीच उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे.
या मोर्चाबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल भंडारे यांनी माहिती अधिकारांतर्गत पोलिसांकडून माहिती मागवली होती. या मोर्चाची परवानगी, मार्ग, बदललेली वाहतूक व्यवस्था तसेच ज्या महिलेने रोष व्यक्त केला होता, तिच्यावरील कारवाईबाबतची माहिती आरटीआयमार्फत विचारण्यात आली होती.
मात्र, पोलीस प्रशासनाकडून त्यांच्याकडे या संदर्भातील कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे उत्तर देण्यात आले आहे. त्यामुळे हा प्रकार प्रशासनासाठी लांछनास्पद असल्याचा आरोप करण्यात येत असून, या प्रकरणाची आयुक्तांनी दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी अनिल भंडारे यांनी केली आहे.





