RATNAGIRI | भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक; चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, संतप्त ग्रामस्थांचा महामार्ग रोको
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील वालोपे परिसरात रविवारी रात्री दुर्दैवी अपघाताची घटना घडली. भरधाव कंटेनर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत चार वर्षीय गार्गी आग्रे या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात तिचे वडील आणि आई गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. संतप्त ग्रामस्थांनी मुंबई-गोवा महामार्गावर उतरून रास्ता रोको आंदोलन केले. अपघातातील कंटेनर चालक आणि मालकाला तातडीने घटनास्थळी आणावे, अशी मागणी आंदोलकांनी केली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले, मात्र ग्रामस्थ आपल्या मागणीवर ठाम राहिल्याने महामार्गावरील वाहतूक तब्बल चार तास विस्कळीत झाली होती.
या आंदोलनामुळे वालोपे परिसराच्या दोन्ही बाजूंना अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मुंबई आणि गोव्याच्या दिशेने जाणारे प्रवासी महामार्गावरच अडकून पडले. अखेर पोलिस प्रशासन, ग्रामस्थ आणि आग्रे कुटुंबीयांमध्ये झालेल्या चर्चेनंतर तोडगा निघाला आणि रात्री वाहतूक सुरळीत करण्यात आली.

