Kalyan : कल्याणच्या काळा तलावात मृत माशांचा खच; दुर्गंधीने नागरिक त्रस्त, वाढत्या तापमानाचा फटका बसल्याची शक्यता
कल्याण शहरातील प्रसिद्ध काळा तलाव परिसरात मोठ्या प्रमाणावर मासे मृत अवस्थेत आढळून आल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
तलावाच्या किनाऱ्यावर मृत माशांचा खच साचल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून सकाळी फिरण्यासाठी आणि व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. वाढत्या तापमानामुळे तलावातील पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने माशांचा मृत्यू होत असल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे.
दररोज ६० ते ७० किलो मृत मासे बाहेर काढले जात असल्याची माहिती काळा तलाव व्यवस्थापनाचे सुपरवायझर अनिल सोनवणे यांनी दिली आहे. या प्रकाराची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि केडीएमसीला देण्यात आली असून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.




