गेल्या काही काळापासून देशातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. अशातच आज आसाम काँग्रेसमध्ये नाट्यमय प्रसंग घडल्याचे समोर आले आहे. आसाम काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष भूपेन बोरा यांनी राजीनामा दिला होता, मात्र अवघ्या काही तासांनंतर त्यांनी यू-टर्न घेत राजीनामा मागे घेतला असल्याचे समोर आले. या सर्व घडामोडींदरम्यान काँग्रेसचे आसाम प्रभारी जितेंद्र सिंग यांनी आणि प्रदेशाध्यक्ष गौरव गोगोई यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. त्यानंतर बोरा यांनी आपला निर्णय मागे घेतला. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
भूपेन बोरा यांची भेट घेतल्यानंतर प्रदेशाध्यक्ष गौरव गोगोई यांनी म्हटले की, बोरा यांनी काँग्रेस हायकमांडकडे निर्णयावर पुनर्विचार करण्यासाठी वेळ मागितला आहे. राहुल गांधी हे बोरा यांच्याशी बोलले आहे, त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आलेला नाही. पुढे बोलताना गोगोई म्हणाले की, ‘जर पक्षातील काही मुद्द्यांमुळे भूपेन बोरा दुखावले असतील तर आम्ही त्यांची माफी मागितली आहे.’
भूपेन बोरा काय म्हणाले?
राजीनाम्याबाबत बोलताना भूपेन बोरा म्हणाले की, ‘मी आत्ताच राजीनामा का दिला यावर चर्चा करणे मला योग्य वाटत नाही. मी तो हायकमांडला पाठवला आहे. जेव्हा मला वाटेल तेव्हा मी तुम्हा सर्वांना बोलवून याबाबत सविस्तर माहिती देईल.’ पक्षातील नाराजीबाबत बोलताना बोरा म्हणाले की, ‘मी राजीनामा का दिला याबद्दल काही लोकांना कल्पना आहे. मी पीसीसी प्रमुखांना सांगितले की जर काँग्रेस पक्ष माजुली यात्रेत कोण सहभागी होईल हे ठरवू शकत नसेल, तर मला वाटते की मी भविष्याच्या दृष्टीने निर्णय घ्यायला हवा.’
भूपेन बोरा यांना भाजपकडून ऑफर?
भूपेन बोरा यांना भाजपकडून ऑफर असल्याची माहिती समोर आली आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिसवा सरमा यांनी भूपेन बोरा यांच्यासाठी भाजपचे दरवाजे खुले आहेत असं म्हटलं होते. सरमा म्हणाले की, ‘जर बोरा भाजपमध्ये सामील झाले तर ते त्यांना सुरक्षित जागेवरून निवडणूक जिंकण्यास मदत केली जाईल.’ त्यामुळे आता बोरा काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


